साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपारिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र प्रकार आहे. साडी नेसायला अवघड असली तरी, संपूर्ण जगात तिच्याबद्दल अपार उत्सुकता असते. जे वस्त्र नेसल्यावर स्त्री सुंदर, आकर्षित आणि मोहक दिसते, ती म्हणजे साडी. साडी हा शब्द संस्कृत भाषेतील शाटी किंवा शाटिका या शब्दावरुन निर्माण झाला आहे. शाटिका म्हणजे चौकोनी आकाराचे लांब वस्त्र. भारतात साडी नेसण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जगातील सर्वात जुन्या वस्त्रांपैकी एक वस्त्र म्हणून ही ओळख आहे. साडीची लांबी साधारण पाच ते नऊ वार असते. भारतात अतिप्राचीन काळापासून साडी नेसण्याची परंपरा आहे. प्राचीन काळातील शिल्पांवरुन भारतात साडी नेसण्याची पद्धत व साडीचे प्रकार लक्षात येतात. भारतात प्रत्येक प्रांतातील साडीचा प्रकार व नेसण्याची पद्धत निरनिराळी आहे. जसे राजस्थानात - बांधणी, घागरा ओढणी. बंगालची पदर घेण्याची पद्धत. दक्षिण भारतातील नारायण पेठी, इरकली, पोचमपल्ली कांजीवरम. मध्य प्रदेशातील चंदेरी. गुजरात, कच्छमध्ये उलटा पदर घेण्याची पद्धत असणारी पटोला. ओरिसात इक्कत. केरळ–धर्मावरम, टेम्पल सिल्क. काश्मिरची कशीदा कारी, तर महाराष्ट्राची पैठणी तसेच जरीची नऊवार, सहावार व बनारसचा शालु. महाराष्ट्रातील साडी नेसण्याची पद्धत वेगळी आहे. तसे साडीला नावेही वेगवेगळी आहेत. जसे लुगडी, चिरडी, पातळ, पीतांबर, शालु आणि पैठणी. त्यात नऊवारी साडी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व रुबाबदार असून पेहरावात शालीनता व भारदस्तपणा दिसतो. साधारणपणे २० व्या शतकात साडीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी केवळ विवाह प्रसंगीच भरजरी वस्त्र नववधूला उपहार म्हणून दिले जाई. मौल्यवान, भरजरी, आकर्षक रंगसंगत व नक्षीकाम असणाऱ्या साड्या नेसल्या जात. यात सर्वप्रथम मान मिळतो तो महाराष्ट्राची पारंपारिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या पैठणी या साडीला. पैठणी साडीला ‘महावस्त्र’, ‘साड्यांची महाराणी’ असे म्हटले आहे. पैठणी साडी आपल्या संग्रहात पाहिजेच, असे प्रत्येक स्त्रीने पाहिलेले स्वप्न असते.
पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला २००० वर्षांची परंपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. प्राचीन काळी पैठणला प्रतिष्ठान, पाटन, पट्टून, पोतान, पैठान अशा अनेक नावांनी ओळखले जात होते. या शहराला सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचा वैभवशाली इतिहास आहे. संतांची भूमी, विद्वान-पंडितांची, विद्यानगरी म्हणून पैठणची ओळख आहे. प्रतिष्ठान ही राजधानी असणाऱ्या सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली, असा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. पैठणी साडीची निर्मितीच प्रामुख्याने भारतातून परदेशात निर्यात करण्यासाठी आणि राजकोषात भर घालण्यासाठी झाली. भारतीय विणकाम, वस्त्राचा पोत, रंगसंगती, नक्षीकाम टिकाऊपणा साडी नेसण्याची पद्धत या सर्व गोष्टी विदेशी ग्राहकांना आकर्षित करत. फार पूर्वीपासून पैठणीला विदेशात प्रचंड मागणी होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून कापड निर्यातीला सुरुवात झाली. गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन काळात पैठणी निर्मिती उद्योगाला नवी ओळख दिली. या काळात हा उद्योग प्रगतीच्या उच्चशिखरावर होता. रोम, इटली या देशात पैठणी वस्त्र मोठ्या प्रमाणात निर्यात होत. एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने-चांदी, हिरे - माणिक यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदी ह्यांची जर वापरुन तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. एक सहावारी साडी विणण्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा काळ लागतो. पैठणीचे वैशिष्ट म्हणजे ती दोन्ही बाजूंनी, पदर आणि बॉर्डर समानच असते. म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही तयार होऊ लागली. पुढे यादव राजवंशाच्या काळातही पैठणीला विदेशात मागणी होती. मराठे, पेशवे यांच्या साम्राज्यात पैठणीला राजाश्रय मिळाला. राज घराण्यातील महिला याच साड्यांना पसंती देत. राजाश्रयाबरोबच नंतर तिला लोकाश्रय मिळू लागला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असणारी पैठणी सौभाग्याचे लेणे म्हणून मिरवू लागली. नववधूला ‘पैठणी’ या महावस्त्राने अलंकृत करुन तिची सासरी पाठवणी होऊ लागली. तिला पूजेत मान मिळाला. पंढरपूरच्या विठू माऊली, कोल्हापुरची अंबाबाई यांना खास पैठणी वस्त्र विणून सजवले जाऊ लागले. जर आणि रेशीम यांच्या एकेक धाग्यांच्या तानाबान्यातून, विविध फुले, पक्षी यांच्या आकृत्यांचे नक्षीकाम विणताना विणकर आपला जीव त्या कलाकुसरीत ओततो. ऐतिहासिक वैभव आणि भारतीय कला यांचा सुंदर मिलाफ पैठणीत दिसतो. पैठणी विणताना विणकरांनी अनेक पिढ्यांचे अनुभव आणि परिश्रम खर्ची घातले असतात. विणकर हातमागावर आयुष्य विणल्यासारखी, एकेका धाग्यातून विणली जाते पैठणी. रोज मान मोडेपर्यंतं, डोळे दुखे पर्यंतं काम करतो हा कलाकार. जीव ओततो रक्त आटवतो आणि मग आईच्या पोटातल्या बाळासारखी रोज थोडा थोडा आकार घेते ही पैठणी. म्हणूनच हातात आली की काळजाला भिडते. मनाच्या गाभ्या पर्यंत आनंद देते.
जसा काळ पुढे सरकत होता तशी राजकीय स्थित्यंतरे घडत गेली. परकीय आक्रमणे झाली. निजामशाही आली. इंग्रज आले, सत्ता बदलांमुळे पैठणी व्यवसायाला उतरती कळा आली. पैठणीचा राजाश्रय हळूहळू संपुष्टात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्या चांदीचे भाव वाढले. हातमाग जाऊन त्यांच्या जागी यंत्रे आली. त्यामुळे हळुहळु पैठणी निर्मितीचे कारागीर बेरोजगार झाले. ग्राहकवर्गही कमी झाला. परिणामी पैठणीचे कारागीर पैठण शहरातून विस्थापित झाले. अनेक विणकरांना बळजबरीने स्थलांतरीत केले गेले. काही पुणे येथे तर, काही कारागिरांना व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी आणून प्रस्थापित केले आणि पैठणी निर्मितीचे केंद्र पैठणहून येवला येथे स्थापन झाले. येवला शहरातही ३०० ते ३५० वर्षांपासून हा व्यवसाय अस्तित्वात आहे. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर शासनाच्या आर्थिक धोरणानूसार पैठण येथे १९६८मध्ये पैठणी उत्पादन केंद्र सुरु करण्यात आले. १९७४ पासून पैठणी उद्योगाचा पुनर्विकास करण्याचे काम शासनाच्या महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाकडे सोपवले. या मंडळाने पैठण व येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना उत्तेजन देऊन पैठणी निर्मितीचे काम जोमाने सुरू केले. परंतु यंत्रयुगामुळे व निर्मितीच्या प्रचंड खर्चामुळे विणलेल्या पैठणीची किंमत अधिकच होती. अशा वेळी पैठणीला मागणी कमी होऊन विवाहप्रसंगी नववधूच्या वस्त्रांमध्ये बनारसी शालुने पसंतीचे स्थान पटकावले. भडक रंगाच्या, भरजरी, यंत्रावरील या साड्यांनी बाजारपेठ काबीज केली. त्याच वेळी ऐतिहासिक, पारंपारिक वारसा असलेल्या पैठणीला पुन्हा सोनेरी दिवस आणण्यासाठी शासनाने जोरदार प्रयत्न सुरु केले. पैठण येथे १९८०च्या दशकात हातमागाची संख्या वाढली. प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणवर्ग सुरू केले. त्यात महिला प्रशिक्षणार्थींची संख्या वाढली. १५ ते २० हातमागांची असणारी संख्या पुढे २०१०च्या दशकात ३०० ते ४०० पर्यंत वाढली. पैठणप्रमाणे येवला येथे ही हातमाग संख्या १९८० साली २५० ते ३०० होती ती २०१० च्या दशकानंतर १०००च्या घरात गेली. आर्थिक अनुदान दिलेय पैठणीचे उगमस्थान पैठण शहर असले तरी येवल्यात आल्यानंतर तिच्या मूळ रुपात फरक झालेला दिसतो. हातमागाची संख्या वाढली तरी गुणात्मकता कमी झालेली दिसते. माझ्या आजीच्या, आईच्या पैठणीमध्ये आणि माझ्या स्वत:च्या पैठणीमध्ये हा फरक सहज ओळखता येतो. येवला आणि पैठणी या दोन्ही ठिकाणीच्या साड्यांमध्ये तुलना केली जाते. पैठणची पैठणी ही खरी ओळख असणारी पैठणीची बाजारपेठ पैठण पेक्षा येवल्यातच मोठ्या प्रमाणावर दिसते. पैठणला पर्यटनासाठी आल्यावर लोक पैठणी खरेदी करतात. पण येवला येथे लग्नकार्याचा बस्ता बांधण्यासाठी, खास पैठणी खरेदीसाठी जातात. सध्याच्या काळात मात्र पैठणीला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. पैठणी साडी ही फक्त नववधूची न राहता लग्नातील संपूर्ण वऱ्हाडातील स्त्रियांची झालेली आहे.
सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी ‘पैठणी’ या कवितेत त्यांच्या आजीच्या पैठणीचे वर्णन केले आहे. त्यातील काही ओळी. "वर्षामागून वर्ष गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडी घडीतून, अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीच्या माझे सोने झाले…."
अशी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे सोने करणारी, सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र पैठणी!
Comments
Post a Comment